मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या अनेक महिन्यांपासून कधी आंदोलन तर कधी उपोषणाचा मार्ग स्वीकारणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. रविवारी आंतरवली सराटीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण न मिळण्यामागे देवेंद्र फडणवीसच असल्याचा दावा जरांगे पाटील यांनी केला होता. त्यापाठोपाठ त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर जाऊन आंदोलन करण्याचा इशाराही दिला होता. मात्र, प्रकृती बिघडल्यामुळे ते आंतरवली सराटीमध्ये परतले. आज दुपारी त्यांनी बेमुदत उपोषण स्थगित करत असल्याचं जाहीर केलं.
मराठ्यांना स्वतंत्र १० टक्के आरक्षण देणारा कायदा राज्य सरकारने मंजूर केला. मात्र, ओबीसी कोट्यातूनच मराठ्यांना आरक्षण मिळायला हवं, स्वतंत्र आरक्षण कायद्याच्या चौकटीत टिकणार नाही, अशी ठाम भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली. तसेच, सगेसोयरेसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी काढलेल्या अधिसूचनेचं पालन केलं जावं, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. मात्र, सरकारमधील सगळे निर्णय देवेंद्र फडणवीसच घेत असून यामागेही त्यांचाच हात असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
“मी हटणार नाही. देवेंद्र फडणवीसची ही जबाबदारी होती. ती मी पार पाडली. रात्री इथे ५ हजार महिला होत्या आणि २५ हजार लोक होते. रात्रीत देवेंद्र फडणवीसला काहीतरी घडवून आणायचं होतं. लोक सैरावैरा पळाले असते रानात. देवेंद्र फडणवीसला दुसऱ्यांदा आंतरवाली सराटी घडवायची होती. मी ते वाचवलं. जर इथे लाठीचार झाला असता, तर सगळा मराठा पेटून उठला असता. राज्य बेचिराख होण्यापासून मी वाचवलं आहे. पहिला हल्ला देवेंद्र फडणवीसनीच केला होता”, अशा शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला.