राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा एकेरी उल्लेख करत सडकून टीका केली. “तुझं खातो का रे?” असं म्हणत भुजबळांनी जरांगे यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला. दरम्यान, भुजबळांच्या टीकेला मनोज जरांगे यांनी देखील प्रत्युतर दिलं. इतकंच नाही, तर जरांगे यांनी राज्य सरकारला इशारा देखील दिला आहे
छगन भुजबळ यांना वेळीच आवरा, अन्यथा आम्ही जशाच तसे उत्तर देऊ, असा सूचक इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. माझ्या जातीच्या आड कोण येत असेल, तर त्याला सोडणार नाही. लोकांचे रक्त पिऊन संपत्ती मिळवली म्हणून तुम्हाला तुरुंगात जावे लागले. मुख्यमंत्री होणे हा भुजबळ यांचा छुपा अजेंडा आहे, असंही जरांगे यांनी म्हटलं आहे.
छगन भुजबळ राज्यात जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोपही मनोज जरांगे यांनी केला. मला कायदा सुव्यवस्था सांभाळायची असल्याने शांततेच्या मार्गाने आंदोलन केले. यापुढेही आम्ही शांततेतच आंदोलन करू, असं जरांगे पाटील म्हणाले. आमच्या आरक्षणाला कोणी धक्का लावणार असेल तर स्वस्थ कसे बसू? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
मराठा समाजाला आरक्षण मिळणार हे भुजबळ यांना समजून चुकले आहे. ते कोणत्याही पातळीवर जाऊन विरोध करणार आहेत. पण आपण त्यांना किंमत द्यायची नाही. आपल्या लढ्यामध्ये राजकारण आणू न देता एकजूट ठेवावी. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणारच, असा पुनरुच्चार जरांगे यांनी केला.
जालन्यात शुक्रवारी ओबीसींची महाएल्गार सभा पार पडली. या सभेत बोलताना छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. जरांगे विचारताय कुणाचं खाताय? “तुझं खातो का रे?” असं म्हणत तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी भाकरी तोडत नाही, अशी टीका भुजबळांनी केली. तू माझ्या शेपटीवर परत पाय देण्याचा प्रयत्न करू नकोस, असा इशारासुद्धा भुजबळ यांनी दिला