मोठी बातमी! मनोज जरांगे यांना मुंबई हायकोर्टात हजर राहण्याचे निर्देश, मनोज जरांगे म्हणाले

0
20

मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांच्या अंतरवली सराटी गावाहून मुंबईच्या दिशेला पायी निघाले आहेत. त्यांचा पायी मोर्चा आज पुण्यात पोहोचला आहे. ते उद्यापर्यंत मुंबईच्या वेशीवर पोहोचू शकतात. त्यांच्यासोबत हजारो मराठा कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले आहेत. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या विरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली. न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्यासमोर या याचिकेवर सुनावणी पार पडली. राज्याचे महाधिवक्ता डॉ. रविंद्र सराफ देखील न्यायालयात उपस्थित होते. गाड्या, बैलगाड्यांसह अनेक मराठे नागरीक हे मुंबईच्या दिशेला येत आहेत. मनोज जरांगे यांच्या या आंदोलनामुळे मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या मोर्चाला प्रतिबंध घालण्यात यावा, सरकारने या मोर्चावर कडक कारवाई करावी, अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली.
यावेळी न्यायाधीशांनी गुणरत्न सदावर्ते आणि महाधिवक्ता रविंद्र सराफ यांचा युक्तिवाद ऐकून घेत असताना महत्त्वाचे निर्देश दिले. “सरकारने रोड ब्लॉक होणार नाही याची खबरदारी घ्यावी. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बिघडणार नाही याची जबाबदारी घ्यावी”, असे निर्देश हायकोर्टाने सरकारला दिले. “मनोज जरांगेंना उच्च न्यायालयात हजर होण्याबाबत नोटीस बजावा. आझाद मैदान पोलिसांनी जरांगे यांना नोटीस बजावावी. आझाद मैदानात 5 हजार पेक्षा जास्त लोक येवू शकत नाही हे देखाल कळवण्यात यावे”, असे आदेश कोर्टाने दिले.

“न्यायालय आम्हालाही न्याय देईल. न्यायमूर्ती आम्हालाही न्याय देतील. आमचेही वकील कोर्टात जातील. काय नोटीस आहेत ते बघू. आमचे वकील आहेत ते बघतील. न्याय मंदिर सगळ्यांसाठी आहे. त्यात काय एवढं घाबरण्यासारखं आहे? न्याय मंदिर आम्हालाही न्याय देईल. त्यात मला काही एवढं विशेष वाटत नाही. न्याय मंदिरासमोर त्यांनी जी बाजू मांडली त्यावर त्यांना न्याय दिला. आमची बाजू आम्ही मांडू, आम्हालाही न्याय मंदिराचा दरवाजा उघडा आहे. न्याय मंदिर आम्हालाही न्याय देणार”, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली.