आपण आपली मनोज जरांगे यांच्या संदर्भातील सर्व भाषणं आणि वक्तव्य मागे घेतोय आणि जरांगेंच्या मतांशी आपणही सहमत असल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. जरांगे सरकारला वेठीस धरत नाहीतर, सरकारचं जरांगेंना वेठीस धरतंय, सरकारनं जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात आणि काही मंत्र्यांना जरांगेंच्या आंदोलनस्थळी कायमस्वरुपी बंगले द्यावेत, सचिवांचं कार्यालयही तिथे उभं करावं, जेणेकरुन जरांगेंनी मागणी उच्चारली की ती तातडीनं सरकारला पूर्ण करता येईल, असं म्हणत छगन भुजबळांनी उपरोधिक टोला जरांगेंना लगावला आहे.
अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ बोलताना म्हणाले की, “जरांगेंचं ऐकायला पाहिजे. मंत्र्यांचे दोन-चार बंगले तिथे बांधले पाहिजेत. त्यांना रोज अभिनव कल्पना येतात, त्यांचा आदर राखला पाहिजे. देवसुद्धा त्यांना घाबरतो, सासू-सासऱ्यांचे मित्र सर्वांना दाखले द्या.” पुढे बोलताना ते म्हणाले की, “माझी भुमिका अशी आहे की, जरांगे यांचं म्हणणं ऐकलं पाहिजे. सर्वांना आरक्षण द्यायला पाहिजे. आपण जरांगे यांचं ऐकलं पहिजे. नाहीतर मोर्चा घेऊन ते येतील. व्याह्याचे व्याही व्याह्याचे व्याही असं सर्वांना आरक्षण दिलं पाहिजे. ते पुढे जाऊन शिक्षणाबाबत शेतकऱ्यांच्याबाबतसुद्धा केलं पाहिजे. माझं तर म्हणणं आहे की, सरकारनं वाटाघाटीचा घोळ घालू नये. ते सांगतात सरकार मान्य करत आहे. मी तर जरांगे यांना सपोर्ट करतोय. सरकारनं फक्त त्यांचंच ऐकायचं, देवसुद्धा त्यांना घाबरतो.” “मी एकदम युटर्न घेतला आहे. सध्या जी अपात्रतेची सुनावणी सूरू आहे, त्याबाबत जरांगे यांच्याशी बोलावं आणि पटकन निर्णय घेतला जावा. उपरोधिक म्हणा, हतबलता म्हणाव काय म्हणायचं आहे ते म्हणा.”, असं मंत्री छगन भुजबळ म्हणाले आहेत.