राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निलेश लंके यांच्याबाबत सूचक वक्तव्य केलं आहे.जयंत पाटील यांनी काही वेळापूर्वी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, निलेश लंके हे अहमदनगरमधील लोकप्रिय नेते आहेत. ते तिथून लोकसभेसाठी उभे राहिले तर १०० टक्के निवडून येतील. त्यांच्याबाबत आम्ही या मताचे आहोत की, लंके आमचे उमेदवार व्हावेत. त्याबाबतीत आवश्यक ते सोपस्कार आम्ही योग्य वेळी पूर्ण करू.
जयंत पाटील म्हणाले, निलेश लंके यांनी तुतारी स्वीकारली की नाही याबाबत मी सध्या भाष्य करणार नाही. कारण असं केल्याने लंके अडचणीत येऊ शकतात आणि मला त्यांना अडचणीत आणायचं नाही. परंतु, मी एक गोष्ट ठामपणे सांगेन की आम्ही अहमदनगर लोकसभा मतदारसंघात तुतारी वाजल्याशिवाय राहणार नाही. अहमदनगर लोकसभा जिंकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.