‘गेल्या दोन-तीन वर्षांच्या काळात महाराष्ट्राच्या जनतेने बदलते सरकार आणि बदलते मंत्री पाहिले, पण जनतेच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहताना कोणीही दिसत नाही,’ अशी उद्विग्न प्रतिक्रिया नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केली आहे. नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर येथील सरकारी रुग्णालयांत झालेल्या रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी त्यांनी हा संताप व्यक्त केला आहे. ‘यापुढे सरकार काही उपाययोजना करणार आहे की, आपण फक्त आसवं गाळायची असा सवालही त्यांनी केला आहे.
हे बळी सरकारी रुग्णालयांमध्येच का जातात, जनतेने सरकारी रुग्णालयांवर विश्वास ठेवावा की नाही, असा प्रश्न आमदार तांबे यांनी केला आहे.
त्यांनी म्हटले आहे, गेल्या दोन-तीन वर्षांच्या काळात महाराष्ट्राच्या जनतेने बदलते सरकार आणि बदलते मंत्री पाहिले, पण जनतेच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहताना कोणीही दिसत नाही. कोरोनासारख्या महामारीनंतर आरोग्य विभागासाठी जास्तीत जास्त उपाययोजना करणे किती गरजेचे आहे, याचा धडा मिळाला होता. तरीही अनुभवातून शिकून वेळीच सावध होणे सरकारला अजूनही जमलेले दिसत नाही. राज्यात मुलभूत सुविधांचीच वानवा असेल, तर जनतेच्या हितासाठी नेमके काय काम सुरू आहे. इतक्या मोठ्या प्रमाणातील रुग्णांच्या मृत्यूंमागे सरकारी रुग्णालयात औषध पुरवठा नसणे, उपचार वेळेवर न होणे, रुग्णवाहिकांची दुरवस्था अशी कारणं समोर येत असतील, तर ही महाराष्ट्राला शरमेने मान खाली घालायला लावणारी गोष्ट आहे, हे कटू सत्य आपल्याला स्वीकारावंच लागेल.