लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मनसे नेते अविनाश जाधव आणि वैभव ठक्कर यांच्यावर पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. सराफा शैलेश जैन (वय ५५) यांच्या तक्रारीवरून लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारीनुसार, जैन यांनी वैभव ठक्करला झवेरी बाजार येथील आपल्या कार्यालयात हिशेबासाठी बोलावले होते. त्यावेळी अविनाश जाधव आणि त्यांचे सहकारी तिथे आले. जाधव यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलिसांसमोर जैन यांचा मुलगा सौमिल याला मारहाण केली.
इतकंच नाही, तर जैन यांच्याकडे ५ कोटी रुपयांची खंडणी देखील मागितली, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी जाधव यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू केला आहे.दुसरीकडे, अविनाश जाधव यांनी या आरोपांचं खंडण केलं आहे. “एका वैभव नावाच्या व्यक्तीने मला कॉल करून मला व माझ्या पत्नीला डांबून ठेवले, असे सांगितले होते. मी त्याला पोलिस नियंत्रण कक्षात कॉल करण्यास सांगितले. त्यानंतर, मी मदतीसाठी पोलिसांसह तेथे गेलो”, असं जाधव यांनी म्हटलं आहे.
आपल्या विरोधात दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत कल्पना नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे. अविनाश जाधव हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष आहेत. राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून त्यांची ओळख आहे. जाधव यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याने मनसैनिक आक्रमक होण्याची शक्यता आहे.