मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू चालणार नाही. हे सूर्यप्रकाशइतके स्वच्छ झालं आहे. तसेच, मिझोरामध्ये प्रादेशिक नॅशनल फ्रंट आणि अन्य पक्षांत लढाई आहे. या लढाईत काँग्रेसचं अस्तित्व आहे. पण, मिझोराममध्ये कुठल्याही परिस्थितीत भाजपाचा विजय होणार नाही, असा हल्लाबोल खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
संजय राऊत म्हणाले, “तेलंगणात भाजपा स्पर्धेत नाही. भाजपाने कार्यकर्त्यांच्या माध्यमातून के. चंद्रशेखर राव आणि एमआयएमला मतदान करण्यासाठी मतदारांना संदेश दिला आहे. पण, काँग्रेसला मतदान करू नये, असंही सांगण्यात आलं आहे. तेलंगणात भाजपाने ही रणनिती आखली आहे. मात्र, तेलंगणात काँग्रेसने मुसंडी मारली असून चांगला निकाल समोर येऊ शकतो.”
छत्तीसगड, मध्य प्रदेशात भाजपाचा पराभव होत आहे. राजस्थानमध्ये अशोक गेहलोत ‘जादूगर’ आहेत. गेहलोतांनी देशाच्या पंतप्रधानांना आव्हान दिलं आहे. पाच वर्षानंतर राजस्थानात एखादं सरकार पुन्हा येत नाही. तिथे अटीतटीची लढाई आहे. तरीही राजस्थानमध्ये काँग्रेस बाजी मारणार आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, प्रियंका गांधींनी पाच राज्यांमध्ये रान पेटवलं आहे,” असं संजय राऊतांनी सांगितलं.