ललित पाटील प्रकरणामुळे राज्यात अमली पदार्थ तस्करीचा प्रकार उजेडात आला आहे. राज्यात अनेक ठिकाणी अमली पदार्थांचा साठाही जप्त केला जातोय. यावरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटातील आमदारांवर तोफ डागली आहे. तसंच, याप्रकरणी मांडवली करण्याचा प्रयत्नही सुरू असल्याचा दावा त्यांनी केला आहे. हा दावा करताना त्यांनी काही लोकांची नावेही जाहीर केली आहेत. त्या आज ठाकरे गटाने आयोजित केलेल्या दसरा मेळावा कार्यक्रमात बोलत होत्या.
देवेंद्र फडणवीस यांना लोक चाणक्य म्हणतात. मला ते पटत नाही. कारण चाणक्याने माणसं घडवायची असतात. उदाहरणार्थ शरद पवार त्यांनी हसन मुश्रीफ, अजित पवार, छगन भुजबळ यांना घडवलं. देवेंद्र फडणवीस यांनी कुणाला घडवलं? त्यांनी कुणालाच घडवलं नाही, त्यांनी फक्त जमवलं. तुमच्याकडे बोलायला लोकच नाहीत. विनोद तावडे, पंकजा मुंडे, एकनाथ खडसे असे अनेक लोक तुम्ही संपवले आहेत असाही आरोप सुषमा अंधारेंनी केला आहे. तुमचा पक्ष इतका मोठा आहे तर मग शिवसेनेतून आणि राष्ट्रवादीतून उचलेगिरी का करत आहेत? हा माझा त्यांना सवाल आहे असंही सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.