शरद पवारांसारखा मोठा नेता ज्यांनीे महाराष्ट्रात अनेक वर्ष काम केलं, पण त्यांनाही या राज्याचा विकास करता आला नाही. आता नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी हे दोन अर्धे पक्ष आणि त्यांच्यासोबत जाऊन अर्धी झालेली काँग्रेस राज्याच्या विकासाच्या गप्पा मारत आहेत. पण या राज्याचा विकास ही तीन चाकांची रिक्षा करु शकणार नाही. महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणे गरजेचे आहे.’, अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नांदेड येथे सभेत महाविकास आघाडीवर हल्ला चढवला.
राज्यातील नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी, आणि त्यांच्यासोबत अर्धी काँग्रेस पार्टी असल्याचा टोला शाह यांनी लगावला. तीन तिगडा काम बिघडा या प्रमाणे उद्धव ठाकरे, शरद पवार यांचे पक्ष अर्धे होतेच पण त्यांनी आता काँग्रेसलाही अर्ध करून टाकलं. ही अशी रिक्षा विकास कसा करू शकेल? असा चिमटा अमित शाह यांनी महाविकास आघाडीवर टीका करतांना काढला. तुमच्या आशीर्वादाने नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले आणि त्यांनी कश्मिरमधून कलम 370हटवले, पाकिस्तानकडून होणारा दहशतवाद, देशाच्या विविध राज्यातील नक्षलवाद संपवला.