शांतीगिरी महाराज यांच्याकडून सोशल मीडियावर जोरदार प्रचार सुरू आहे. त्यासाठी त्यांची एक स्वतंत्र टीम कार्यरत आहे. त्यामध्ये विविध युवक काम करीत आहेत. निवडणुकीसाठी काही राजकीय मंडळींची सल्लागार समितीदेखील त्यांनी तयार केली आहे. या समितीच्या सूचनेनुसार ते प्रचारात मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. त्यांच्या भक्तांना ते रोज एक संदेश देत असतात. भक्तांनी स्वखर्चाने त्यांचा प्रचार करावा. स्वतःचे वाहन घेऊन मतदारांच्या गाठीभेटी कराव्यात. इथपासून तर विविध प्रकारचे उपक्रम ते राबवित आहेत. त्यांचे हे उपक्रम चर्चेचा विषय ठरले आहेत.
शांतीगिरी महाराज यांनी नुकतेच सर्व राजकीय पक्षांना एक आवाहन केले आहे. आतापर्यंत नाशिक मतदारसंघातून विविध 17 खासदार जनतेने निवडून दिले आहेत. त्यामुळे यंदा राजकीय पक्ष आणि मतदारांनी शांतीगिरी महाराज यांचा विचार करावा. सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वेगळा विचार करावा. ही निवडणूक बिनविरोध कशी होईल, यासाठी पुढाकार घ्यावा. शांतीगिरी महाराज यांना बिनविरोध निवडून द्यावे. तसे करून राजकीय पक्ष आणि नेत्यांनी आपली शान राखावी, असे आवाहनच त्यांनी केले आहे.