महाराष्ट्राच्या जनतेने १० पैकी आठ ठिकाणी आपले उमेदवार निवडून दिले. तसंच या निवडणुकीने देशात एक संदेश पाठवला आहे की महाराष्ट्राचं वातावरण बदलतं आहे. महाराष्ट्रातली सत्ता भाजपा आणि त्यांच्या मित्रांकडे आहे. पण मला खात्री होती की महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात गेल्यानंतर लोकांशी मी संवाद साधला. त्यामुळे निकाल वेगळा लागणार आहे हे मला स्पष्ट दिसत होतं. ४८ जागा या ठिकाणी लोकसभेच्या आहेत. त्यापैकी ३१ ठिकाणी भाजपाचा पराभव झाला आहे. आम्हाला हे ठाऊक आहे की अनेक अडचणी आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. साखर कारखान्यांचे प्रश्न आहेत. म्हणावा तसा पाऊस अद्याप पडलेला नाही. लोकांचं दुःख कमी करण्यासाठी सत्तेचा वापर करायचा असतो. आमचा प्रयत्न त्याच दृष्टीने असणार आहे.
मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मी फिरलो आहे. पण या गावात आलो नव्हतो. आज या गावात आलो आहे.आज मी सांगू इच्छितो की राजकारणात काही कमी जास्त होत असतं पण सगळ्या गोष्टी सोडून पुन्हा एकदा जोमाने कामाला लागायचं असतं. लोकांचं कल्याण ज्या गोष्टीमध्ये आहे ते केलं पाहिजे. तुम्ही सगळ्यांनी जे स्वागत केलं त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.