राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका वृत्तपत्रात मुलाखत दिली आहे. त्या मुलाखतीत अनेक धक्कादायक बाबी त्यांनी उघड केल्या आहेत. शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाची स्थापना १९९९ मध्ये केली. त्याच्या पाच वर्षानंतर २००४ मध्ये राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा मिळाल्या. त्यावेळी राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करता आला असता, असा आरोप अजित पवार सातत्याने करत आहे. अजित पवार यांच्या या आरोपाला शरद पवार यांनी मुलाखतीत उत्तर दिले. २००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता.
२००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला ७१ तर काँग्रेसला ६९ जागा मिळाल्या. त्यानंतर काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला. पक्षातील लोकांनी अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी त्यावेळी केली होती. परंतु शरद पवार यांनी मंत्रीपद जास्त घेऊ आणि काँग्रेसला मुख्यमंत्रीपद देऊ, अशी भूमिका घेतली. त्यांच्या या भूमिकेवर अजित पवार आता टीका करत आहेत. त्या टीकेला शरद पवार यांनी उत्तर दिले आहे. २००४ मध्ये पक्षात मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता. त्यावेळी छगन भुजबळ यांच्याकडे मुख्यमंत्रीपद दिले असते तर पक्षात फूट पडली असती, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.