लाडकी बहीण योजना ही महायुतीसाठी गेमचेंजर योजना ठरली. महायुतीचा जो महानिकाल लागला आणि २३७ आमदारांचं बळ महायुतीला मिळालं त्यात लाडक्या बहिणींचा आणि लाडकी बहीण योजनेचा सिंहाचा वाटा आहे. दरम्यान भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी मुस्लिम कुटुंबात जर दोन पेक्षा जास्त मुलं असतील तर त्यांना लाडकी बहीण योजनेतून वगळा असं म्हटलं आहे.
“हिंदू समाजावर जो अन्याय होतो आहे त्याविरोधात हिंदू न्याय यात्रा आज निघाली होती. आमच्या सिंधुदुर्गात आमच्या हिंदू समाजाने बांगलादेशात असलेल्या हिंदू माता-भगिनी आणि बंधूंसाठी त्यांचा आवाज बनण्यासाठी मोर्चा काढला होता. बांगलादेशातले हिंदू एकटे नाहीत हे सांगण्यासाठी आम्ही हा मोर्चा काढला होता. महाराष्ट्रातला हिंदू समाज त्यांच्याबरोबर आहे. त्यांच्यावर होणारे अत्याचार आम्ही पाहतो आहोत, मात्र आम्हाला विश्वास आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठल्याही हिंदूवर अत्याचार होऊ देणार नाही. त्यामुळेच आम्ही न्याय यात्रा काढली होती.” असं नितेश राणे म्हणाले.
मुस्लिम कुटुंबात दोन अपत्यांपेक्षा जास्त अपत्य असतली तर त्या कुटुंबाला लाडकी बहीण योजनेचा लाभ देऊ नये ही आमची मागणी आहे कारण मतदान करताना यांना मोदी नको असतात, हिंदुत्वाच्या विचारांचं सरकार नको. मात्र प्रत्येक शासकीय योजनेचा लाभ जास्त प्रमाणात घेणारे मुस्लिम कुटुंब असतात. मग तुम्ही लाभ कशाला घेता? लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींची जी यादी आहे त्यात जास्तीत जास्त लाभ मुस्लिम आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी विनंती करणार आहे की आदिवासी समाज वगळून ज्यांना दोनपेक्षा जास्त अपत्यं असतील त्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळावं असं नितेश राणेंनी म्हटलं आहे.