महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सहा जागांसाठीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. या निवडणुकीसाठी दाखल झालेला अपक्ष उमेदवाराचा सातवा अर्ज छाननीत बाद झाला आहे. 20 फेब्रुवारी ही उमेदवारीला अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असून त्यादिवशी याबाबतची अधिकृत घोषणा केली जाईल. राज्यसभेच्या सहा जागांसाठी सातजणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
भाजपकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे या तिघांनी अर्ज केले. तर, शिवसेनेकडून मिलिंद देवरा, राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल तर काँग्रेसकडून चंद्रकांत हांडोरे यांनी अर्ज दाखल केले. तर अपक्ष म्हणून विश्वास जगताप यांनी अर्ज भरला होता. मात्र, या निवडणुकांसाठी सूचक, अनुमोदक म्हणून आमदारांच्या सह्या लागतात. त्याची पुर्तता जगताप यांच्याकडून करण्यात आली नाही. त्यामुळे त्यांचा अर्ज छाननीत बाद करण्यात
आलं.दरम्यान, भाजपच्या तीन आणि शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या एक अशा सहा उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्यात जमा आहे. 20 तारखेला अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी याबाबतची अधिकृत घोषणा केली जाईल.