लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर अजितदादा गटात अधिक चुळबुळ उडाली आहे. विशेष म्हणजे शरद पवार गटाचे फक्त तीन खासदार असताना, त्यांच्या मागे आमदारांचं बळही नसतानाही शरद पवार गटाने अत्यंत चुरशीच्या लढतीत 8 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे राज्यात अजितदादा नव्हे तर शरद पवार यांचाच सिक्का चालत असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे अजितदादा गटाच्या आमदारांना टेन्शन आलं आहे. हे आमदार पक्ष सोडून जाण्याच्या चर्चाही रंगल्या आहेत. त्यामुळे काल अजितदादा गटाच्या बैठकीत आमदारांनी शपथा घेतल्याचं समोर आलं आहे. आम्ही अजितदादांना सोडून कुठेच जाणार नाही, अशी शपथच या आमदारांनी घेतल्याची माहितीसमोर आली आहे.
अजितदादा गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनीही या वृत्तावर शिक्कामोर्तब केलं आहे. काल आमदारांची बैठक झाली. या बैठकीत सर्वच आमदारांनी शपथ घेतली आहे. विधानसभा निवडणुकीत पराभव झाला तरी अजितदादांना सोडणार नाही, अशी शपथ या आमदारांनी घेतल्याचं हसन मुश्रीफ यांनी सांगितलं. तसेच शरद पवार गटाचे नवीन मालक रोहित पवार यांनी शरद पवार गटात येण्याचं आमंत्रण दिलं आहे. त्याला कोणीही प्रतिसाद देणार नाही, असा दावा हसन मुश्रीफ यांनी केला आहे.