उपमुख्यमंत्री अजित पवार भाजपमध्ये आता तेवढा वट राहिला नसल्यानेच त्यांना फक्त लोकसभेच्या चार जागा मिळणार आहेत. त्यात शिरूर नसेल, कारण भाजप आणि शिवसेना त्यासाठी आग्रही असून ते अजितदादांचे ऐकणार नाहीत, असा दावा आमदार रोहित पवार यांनी पिंपरीत पक्ष कार्यालयात केला. शिवसेनेची ही जागा जर अजित पवारांकडे गेली तर उमेदवार त्यांच्याच कुटुंबातील असेल, असे ते म्हणाले. त्यांचा रोख अजित पवारांचे पुत्र पार्थ यांच्या दिशेने होता. कोल्हेंना पाडणार हा अहंकार बरा नव्हे, असा टोलाही त्यांनी काका अजित पवारांना या वेळी लगावला. त्यासाठी मी पुन्हा येईन असे म्हणणाऱ्यांचे काय झाले याचा दाखला त्यांनी दिला.
लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची भाजपमध्ये किंमत राहणार नाही. ती ठेवली जाणार नाही, असा दावा रोहित पवार यांनी या वेळी केला. बारामती लोकसभेतील लढाई ही सुप्रियाताई आणि अजितदादा अशीच होईल, असे ते म्हणाले. लोकसभेनंतर शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादीला विधानसभेला भाजपच्या चिन्हावर लढण्याची पाळी येईल, असे भाकीत त्यांनी केले.