पंतप्रधान किसान सन्मान निधी या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये दिले जातात. हे पैसे दर चार महिन्यांनी प्रत्येकी 2,000 रुपयांच्या तीन वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये दिले जातात. यातच आता अशी बातमी समोर येत आहे की, शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या या हप्त्याची रक्कम वाढू शकते. इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे.
केंद्रीय अर्थसंकल्प 23 जुलै 2024 रोजी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत सादर करतील. यादरम्यान यावेळी त्या अनेक महत्त्वाच्या घोषणा करू शकतात. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री पीएम किसान योजनेअंतर्गत मिळणाऱ्या हप्त्याची घोषणा देखील करू शकतात.
इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने सांगितलं आहे की, आत्तापर्यंत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या 6,000 रुपये वार्षिक हप्त्यात वाढ करून ही रक्कम 8,000 रुपयांपर्यंत केली जाऊ शकते. याबाबतचा सल्ला कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांनी अर्थमंत्र्यांना दिल्याचे बोलले जात आहे. मात्र अद्याप अधिकृत घोषणा न झाल्याने हप्ता वाढणार की नाही हे जाणून घेण्यासाठी अर्थसंकल्पाची वाट पाहावी लागणार आहे.