पुण्यात १९ मेच्या पहाटे मद्यधुंद अवस्थेत पोर्श ही कार चालवत एका बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने बाईकवरुन घरी जाणाऱ्या अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांना उडवलं. या दोघांचा या अपघातात मृत्यू झाला. यानंतर या अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली होती. मात्र १५ तासांत त्याला जामीन मिळाला. १५ तासांत त्याला जामीन मिळाल्यानंतर सोशल मीडिया आणि समाजात संताप व्यक्त झाला. १९ तारखेपासून या घटनेवर विविध पडसाद उमटत आहेत. समाजात हा विषय चर्चिला जातो आहे. अशात या मुलाच्या वडिलांना आणि आजोबांना अटक करण्यात आली आहे. तर मुलाची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणात आता नाना पटोलेंनी धक्कादायक आरोप केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हे सांगितलं पाहिजे की डॉ. तावरेंची नियुक्ती कुणाच्या सांगण्यावरुन झाली आहे? कुठल्या आमदाराने पोलीस आणि डॉक्टरांशी बोलत होते? त्या कारमध्ये कोण होतं? ते अजून कळलेलं नाही. ही नावं का लपवली जातात? पोर्श कार प्रकरणात ज्या पबमधून निघाली होती दोन कार्सची रेस लागली होती. या रेसमध्ये या पोर्शने दोन निरपराध जीव घेतले. आरोपींना निबंध लिहायला लावणं म्हणजे तर मोठी थट्टा आहे. असाही आरोप नाना पटोलेंनी केला आहे. कितीवेळा चिरडू शकता हे विचारायचं होतं का? असा प्रश्न नाना पटोलेंनी विचारला आहे. या घटनेत आमदाराचा मुलगाही होता. आम्ही त्याचं नाव सांगणार नाही ते नाव सरकारने जाहीर करावं या प्रकरणात दोन उपमुख्यमंत्री आरोपीच्या पिंजऱ्यात आहेत असाही आरोप नाना पटोलेंनी केला आहे.