भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवसांत राज्यात पाऊस कायम राहणार आहे. काही जिल्ह्यांमध्येही अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भातील भंडारा चंदपूर आणि यवतमाळ जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.
तर कोकणातील रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. मुंबईसह उपनगरातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून आज मुंबईला ऑरेंज अलर्ट आहे. पुणे जिल्ह्यातही येत्या ४८ तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार आहे. अकोला, अमरावती, नागपूर भंडारा, ठाणे पालघर या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. दुसरीकडे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी तसेच धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. दरम्यान, पुणे शहरासह परिसरात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण तुडुंब भरले आहे.
त्यामुळे या धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. सध्या धरणामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. येत्या काही तासात पुणे शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे
भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर आणि पुणे शहरातील शाळा २५ जुलै रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.सुहास दिवसे यांनी दिले आहेत. नागरिकांना काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.