बारामतीमधून महायुतीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या महायुतीच्या सभेसाठी रामदास आठवलेंनी चौफेर टोलेबाजी केली. यावेळी त्यांनी भाषणाची सुरुवातच कवितांनी केली. “एवढंच सांगतो की ‘अजित पवार महायुतीसोबत आले ज्या कारणामुळे, ते कारण आहेत सुप्रिया सुळे, अजित पवार आता राहिले नाहीत खुळे, त्यामुळेच हरणार आहेत सुप्रिया सुळे… कुणी कितीही केला कल्ला, तरी सुनेत्रा पवारच जिंकणार आहेत बारामतीचा किल्ला.. अजित पवारांनी गाठलाय विकासाचा पल्ला.. म्हणूनच मी शरद पवारांना देतो मोदींसोबत येण्याचा सल्ला”, असं त्यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. पवार यांच्यावर ‘बाहेरची सून’ म्हणून टीका करणाऱ्या विरोधकांना रामदास आठवलेंनी कवितेच्या माध्यमातून खोचक उत्तर दिलं. “सुनेत्रा पवार यांच्याकडे आहेत फारच चांगले गुण, तरी तुम्ही म्हणताय ही बाहेरची आहे सून, सुनेत्रा पवार निवडून येण्याचा महिना आहे जून आणि अजित पवार फेडतील बारामतीकरांचे ऋण”, असं रामदास आठवले म्हणाले. अजित पवारांनी सर्वात आधी निर्णय घेतला की सुनेत्रा पवारांना उभं करायचं. तेव्हा शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना उभं करायला नको होतं. ही सून बाहेरची कशी झाली? सुप्रिया सुळेच बाहेरच्या आहेत. त्यांचं लग्न झाल्यानंतर त्या सुळे कुटुंबात गेल्या आहेत. सुनेत्रा पवार या पवार कुटुंबात आल्या आहेत. त्यामुळे त्यांना बाहेरचं म्हणणं योग्य नाही. त्या आपल्या सून आहेत”, असं रामदास आठवले म्हणाले. “गावागावातली म्हणत आहेत म्हातारी, शरद पवार का घड्याळ सोडून वाजवत आहेत तुतारी?” अशी चारोळीही रामदास आठवलेंनी यावेळी केली.
गावागावातली म्हणत आहेत म्हातारी, शरद पवार का घड्याळ सोडून…रामदास आठवलेंचे तुफानी भाषण
- Advertisement -