राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची संघर्ष यात्रेने सध्या अमरावती जिल्ह्यामध्ये प्रवेश केला आहे. युवकांचे प्रश्न मांडण्यासाठी रोहित पवार हे या संघर्ष यात्रेच्या माध्यमातून रस्त्यावर उतरलेत.
अमरावती जिल्ह्यामध्ये या यात्रेदरम्यान रोहित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ज्यामध्ये बोलताना त्यांनी आम्ही जे प्रश्न संघर्ष यात्रा घेवून अधिवेशनावर जात आहे, पण ते प्रश्न सुटले नाही तर याच रूपांतर आंदोलनात करण्यात येईल, असा इशारा सरकारला दिला.
“दुष्काळामधून जिल्ह्यातील अनेक तालुके वगळण्यात आलेत. सरकारने पहिली ४० तालुक्यांची यादी पाठवली पण, दुसरी ९०-१०० तालुक्यांची यादी अद्याप केंद्र सरकारकडे पाठवली नाही. एनडी आर एफकडून मदत मिळाली पाहिजे. अमरावती जिल्ह्यात पालकमंत्री आले नाहीत म्हणून जिल्हा मदतीपासून वगळण्यात आला आहे,” असा आरोप रोहित पवार यांनी यावेळी केला.
यावेळी बोलताना रोहित पवार यांनी राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाच्या वादावर मोठे विधान केले. “निवडणूक येवू दया, मग घड्याळ कोणाकडे राहिलं हे समजेल. निवडणूक आयोगाला एकतर्फी निर्णय देता येणार नाही, आता फक्त अजित पवार मित्र मंडळ आहे,” असा टोला त्यांनी लगावला.
तसेच भाजपासोबत जाण्याचा निर्णय जर पवार साहेबांचा असता तर पूर्ण पक्ष गेला असता, असेही रोहित पवार यावेळी म्हणाले. मला पण सत्तेत जाण्यासाठी चान्स होता पण गेलो नाही. जेव्हा पक्षापेक्षा नेते मोठी होतात, तेव्हा असे वागायला लागतात. राष्ट्रवादी आमचा पक्ष आहे. बाकीचे सर्व मित्र परिवार आहे,” असेही रोहित पवार यावेळी म्हणाले.