सध्या राज्यातून उन्हाळ कांदा हा परदेशात पाठवला जात आहे. परंतु हा कांदा परराज्यात पाठवताना त्यात काहीतरी गोलमाल केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
नाफेड’ने बफर स्टॉक म्हणून खरेदी केलेला उन्हाळ कांदा परराज्यांत पाठवताना गोलमाल केल्याचा आरोप कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केला आहे. उन्हाळ कांद्याऐवजी चक्क सुमार दर्जाचा लाल कांदा रेल्वे रेकद्वारे परराज्यांत पाठवण्याचा प्रकार उघडकीस आणल्याचा आरोप शेतकरी संघर्ष समितीचे किरण सानप आणि गोरख संत यांनी केलाय. लासलगाव रेल्वे स्टेशनवर गुरुवारी कांद्याची रेक लागलेली होती. ती पडताळण्यासाठी किरण सानप आणि संत तेथे गेले असता गोण्यांमध्ये पॅकिंग केलेला कांदा हा उन्हाळ कांदा नसून तो नुकताच बाजारात आलेला लाल कांदा असल्याचा दावा सानप यांनी केलाय. ‘नाफेड’ने बफर स्टॉकमध्ये खरेदी केलेला उन्हाळा कांदा बाजारात जाताना तो लाल कांदा कसा झाला, हा चमत्कार कसा घडला, असा प्रश्न यामुळे उपस्थित होतोय.
लालसलगाव रेल्वे स्थानकावरील पाहणीत ‘ए ग्रेड’चा कोणताही कांदा आम्हाला आढळला नाही. त्यात गोल्टी किंवा सडके कांदेच पाहायला मिळाले आणि जे काही चांगले होते ते सगळे कांदे खरे तर ४५ एमएम असायला हवे. परंतु, ते साधारणपणे १५ ते २० एमएम साइजच्या आतले आढळले. त्यामुळे ‘नाफेड’ मध्ये कांदा खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आमचा आरोप खरा असल्याचे सानप यांचं म्हणणं आहे.
सानप आणि संत यांनी लासलगाव रेल्वे स्टेशनवरील बोगीमध्ये कांद्याची पडताळणी सुरू करताना पुरावा म्हणून व्हिडीओ शूटिंग सुरू केले असता त्यांना मज्जाव केला गेला. हा व्हिडीओ डीलीट करण्याचा दबावही तेथील यंत्रणेकडून आणला गेला. आम्ही तेथून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला असता संत यांना तेथील ‘आरपीएफ’ पोलिसांनी पोलिस ठाण्यामध्ये नेण्यात आले, असा आरोपही सानप यांनी केला. लासलगावहून रेल्वे 66 रकमध्य उन्हाळऐवजी नुकताच बाजारात आलेला लाल कांदा लोड केला गेला. याचा अर्थ आम्ही ‘नाफेड’वर भ्रष्टाचाराचा केलेला आरोप सिद्ध झाला आहे. राज्य व केंद्र सरकार यांनी यातील साखळी शोधून कारवाई करावी, अशी मागणी देखील किरण सानप यांनी केलीय.