अहिल्यानगर-केवळ 10 टक्के रक्कम भरून सौर वीजनिर्मिती पॅनेल्स व कृषी पंप असा संपूर्ण संच शेतकर्यांना देण्याच्या मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या अंमलबजावणीत महावितरणने अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या नऊ महिन्यात 7 हजार 630 पंप बसविले आहेत. महावितरण विभागाने ही माहिती दिली. राज्य सरकारने फेब्रुवारी महिन्यात अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती. या योजनेत शेतकर्यांना प्रधानमंत्री कुसुम योजनेत केंद्र सरकारकडून 30 टक्के तर राज्य सरकारकडून 60 टक्के अनुदान मिळते. त्यामुळे केवळ 10 टक्के रक्कम भरून सिंचनासाठी कृषी पंपासह संपूर्ण संच मिळतो. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकर्यांना केवळ 5 टक्के लाभार्थी हिस्सा भरावा लागतो.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शेतकर्यांची पेड पेंडिंगची समस्या सोडविण्यासाठी ही योजना राबविण्यासाठी आग्रह आहे. शेतकर्यांना सिंचनाच्या बाबतीत स्वतंत्र करणारी आणि त्यांना दिवसा सिंचनाची सुविधा उपलब्ध करणारी ही योजना प्राधान्याने राबविण्याची सूचना त्यांनी केली आहे. सौर कृषी पंप बसविण्यामध्ये महाराष्ट्र राज्याने देशात आघाडी घेतली असून त्याबद्दल नुकताच केंद्र सरकारने आयोजित केलेल्या बैठकीत राज्याचा गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला. राज्यात 11 डिसेंबरपर्यंत एकूण एक लाख हजार 462 सौर कृषी पंप महावितरणकडून बसविण्यात आले आहेत. यामध्ये सर्वाधिक पंप जालना (15,940) जिल्ह्यात बसविण्यात आले आहेत.
त्या पाठोपाठ बीड (14,705), परभणी (9,334), अहिल्यानगर (7,630), छत्रपती संभाजीनगर (6,267) आणि हिंगोली (6,014) जिल्ह्यांमध्ये बसविण्यात आले आहेत. राज्य सरकारने राज्यात साडेदहा लाख सौर कृषी पंप बसविण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. दहा लाखापेक्षा जास्त पंप बसविण्यात येणार असल्याने कृषी पंपासाठी पैसे भरून वीज कनेक्शनची प्रतीक्षा करणार्या सर्व शेतकर्यांचा पेड पेंडिंगचा प्रश्न सुटणार आहे.