लोकसभा निवडणुकीच्या यशानंतर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फटका बसला. यानंतर महाविकास आघाडीतील धुसफूस समोर येत आहे. नुकताच काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी महाविकास आघाडीला घरचा आहेर दिला. यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी काँग्रेस आणि ठाकरे गटाला टोला लगावला. यामुळे आगामी महापालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार की स्वतंत्र मैदानात उतरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा केली आहे.
“मुंबईसह नागपूरपर्यंत आम्ही महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढवणार आहोत. मग काय होईल ते होईल? एकदा आम्हाला आमची ताकद आजमावायचीच आहे. आम्ही महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढणार आहोत. नागपूरला सुद्धा आम्ही स्वबळावर लढणार आहोत. आम्हाला उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भातील संकेत दिलेले आहेत. आमचा असा निर्णय होत आहे की मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर असेल. कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार? कारण आघाडीत आणि विधानसभेत कार्यकर्त्यांना निवडणूक लढण्याची संधी मिळत नाही. त्याचा फटका पक्षाला आणि पक्षाच्या वाढीला बसतो. महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि नगरपंचायतीमध्ये निवडणुका स्वबळावर लढून आपआपले पक्ष मजबूत करावे लागतात”, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.