राज्यात विधानसभा निवडणुकी महायुतीने प्रचंड बहुमत मिळवलं. महायुतीतील सर्वच मित्रपक्षांनी या निवडणुकीत चांगली कामगिरी केली. विधानसभेच्या निवडणुकीनंतर आता महायुती मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे. दरम्यान, शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाने आज यासंदर्भात मुंबईत बैठकही घेतली. या बैठकीनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीबाबत माहिती दिली.
“आजची बैठक मुंबई महापालिका निवडणुकीसाठी होती. विधानसभेची निवडणूक महायुतीने मोठ्या मताधिक्क्याने जिंकली. लँड स्लाईड व्हिक्टरी मिळाली. न भुतो, न भविष्यती असा विजय झालाय. मुंबईचा विकास करायचा आहे. गेल्या अडीच वर्षांत सरकारने काम केलंय. कोस्टल काम, अटल सेतू, मेट्रोचं उद्घाटन, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, बीएमसीच्या रुग्णालयात सुधारणा केल्यात, याचा थेट फायदा मुंबईकरांना झालाय”, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, “मुंबईकर जो मुंबईच्या बाहेर फेकला गेलाय, त्याला पुन्हा मुंबईत आणायचं काम आम्ही करणार आहोत. याबाबतीत सर्व यंत्रणा काम करणार आहेत. म्हणून लाखो लोकांना हक्काचं घर देण्याचं काम आपलं सरकार करणार आहे. त्यामुळे ही महत्त्वपूर्ण बैठक होती. महायुती पूर्ण ताकदीने विधानसभेप्रमाणे मुंबई पालिकाही लढणार आणि जिंकणार. मुंबईकरांना जशी मुंबई पाहिजे तशी मुंबई देणार आहोत”, असं आश्वासनही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईकरांना दिलं.
राज्य मंत्री मंडळ विस्तारात शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या मंत्र्यांना अडीच वर्षाचा कालावधी मिळणार.
मंत्र्यांचा पहिल्या अडीच वर्षाचा कालावधी संपल्यावर दूसऱ्या आमदारांना पुढील अडीच वर्षाचा कालावधी मंत्री पदासाठी मिळणार.
शिवसेनेच्या या अडीच-अडीच वर्षाच्या फॅार्मुलामुळे शिवसेना पक्षातील आमदारांच्या मोठ्या संख्येला मंत्री पदाची संधी मिळणार.
मंत्री मंडळ विस्तारात शिवसेनेचा सामाजिक, प्रादेशिक आणि सर्वाधीक आमदारांना मंत्री पदाची संधी देणार फॉर्म्युला.