मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भात शिवसेना (शिंदे) नेते तथा माजी मंत्री गुलाबराव पाटील यांनी मोठं भाष्य केलं आहे. तसेच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासाठी एवढा वेळ का लागत आहे? याचं कारण देखील सांगितलं आहे. तसेच ‘आम्ही गृहमंत्रिपदाचा आग्रह अद्यापही सोडलेला नाही’, असं मोठं विधान गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केलं. त्यांच्या या विधानामुळे महायुतीत गृहमंत्रिपदाचा तिढा अद्यापही कायम असल्याची चर्चा रंगली आहे.
मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भात आम्ही सर्व अधिकार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेले आहेत. तसेच जेव्हा महायुतीचे तिन्ही नेते एकत्र बसतील तेव्हा ठरवतील. मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. मात्र, तीन पक्ष असल्यामुळे मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी वेळ लागत आहे. आता शिवसेनेला किती खाते मिळतील? हे देखील आम्हाला माहिती नाही. याचा अर्थ असा आहे की आम्ही सर्व अधिकार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहेत. त्यामुळे आता आमच्या पक्षाला किती मंत्रिपदे घ्यावी? कोणती खाते घ्यावे? हे सर्व एकनाथ शिंदे ठरवतील”, असं गुलाबराव पाटील यांनी सांगितलं.
“शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याकडून अशी कोणतेही वक्तव्य नाही की आम्हाला एवढे खाते मिळतील? किंवा आम्हाला हे मंत्रिपद मिळेल. याचा अर्थ हा आहे की आमच्यामध्ये एक वाक्यता आहे. तसेच एकनाथ शिंदे यांना गृहखातं मिळावं, यासाठी सर्वच आमदारांनी आग्रह केला होता. तसेच आम्ही गृहमंत्रिपदाचा आग्रह अद्यापही सोडलेला नाही. आम्ही गृहमंत्रिपदाचा आग्रह जरी धरलेला असला तरी यासंदर्भातील निर्णय घेण्याचा अधिकार हा एकनाथ शिंदे यांना दिलेला आहे”, असंही गुलाबराव पाटील यांनी सांगितलं.