पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने सर्वच क्षेत्रात प्रगती साध्य केली आहे. आता पुन्हा एकदा देशाला विकसीत राष्ट्र बनविण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना आपल्याला विजयी करायचे आहे. देशातील चारशे जागा जिंकताना नगर जिल्ह्यातील दोन जागांचाही समावेश यामध्ये राहील असा विश्वास पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यत केला.
शिर्डी लोकसभा मतदार संघातील निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री विखे पाटील यांनी आज दाढ बुद्रूक, दुर्गापुर, हसनापूर, या गावांमध्ये मतदारांशी संवाद साधला. विविध ठिकाणी झालेल्या बैठकांमधून ना. विखे पाटील यांनी केंद्र सरकारने मागील दहा वर्षात घेतलेल्या निर्णयांची माहीती देवून विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने केलेल्या वाटचालीचा आढावा घेतला.सबका साथ सबका विकास आणि सबका प्रयास या मंत्राने नरेंद्र मोदी यांनी मागील दहा वर्षात योजनांवर काम सुरु केले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्या समोर ठेवून त्यांनी सामान्य माणसाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केलेले काम हे देशातील जनतेला सामाजिक न्याय देणारे ठरले आहे. यापुर्वी काँग्रेसचेही सरकार देशात आणि राज्यात होते. परंतू त्यांनी कधीही सामान्य माणसाच्या हिताचे निर्णय घेतले नाहीत.आज भारत देश औद्योगिकदृष्ट्या प्रगत राष्ट्र म्हणून, जगामध्ये ओळखले जात आहे. केंद्र सरकारच्या धोरणात्मक निर्णयांमुळे देशाची अर्थव्यवस्था आज पाचव्या क्रमांकावर आली आहे.