नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघातून महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचे निश्चित झाले आहे. आज (6 मे) उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशीपर्यंत महायुतीच्या नेत्यांकडून त्यांच्या मनधरणीसाठी प्रयत्न करण्यात आले, पण ते शेवटपर्यंत अपक्ष लढण्याच्या निर्णयावर ठाम राहिले. महाराजांच्या या उमेदवारीचा नाशिकसह दिंडोरी, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर या मतदारसंघांमध्येही मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
शांतीगिरी महाराज यांचा छत्रपती संभाजीनगरसह धुळे, जळगाव, नाशिकमध्येही मोठा भक्तपरिवार आहे. या भक्तांच्या विश्वासावर त्यांनी 2009 मध्ये छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून अपक्ष म्हणून लोकसभेच्या मैदानात उडी घेतली होती. त्यावेळी त्यांनी दीड लाख मते घेतली होती. त्यांच्या उमेदवारीचा तेव्हाचे शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना मोठा फटका बसला होता. 2004 मध्ये एक लाख 32 हजारांचे मताधिक्य घेणाऱ्या खैरेंचे 2009 मध्ये मताधिक्य अवघ्या 32 हजारांवर आले होते.