विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवून गुरूवारी सत्तारूढ होणार्या महायुती सरकारमध्ये नगर जिल्ह्यामधून कोणाची वर्णी लागणार, याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. मावळत्या सरकारमध्ये महसूलमंत्री असलेले सहकारातील मातब्बर नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मंत्रिमंडळातील समावेश निश्चित मानला जात आहे. यावेळी महायुतीला मतदानातून भरघोस साथ देणार्या नगर जिल्ह्यातून आणखी कोणाला मंत्रिपदाची संधी मिळणार, याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. मात्र रात्री उशिरापर्यंत शपथविधीसाठी अधिकृत निरोप न आल्याने संभ्रम वाढला होता.
या सरकारमध्ये अखेरच्या काही महिन्यांमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांच्या रूपाने जिल्ह्याला दुसरी संधी मिळाली होती. 2019 च्या महाविकास आघाडीच्या प्रयोगानंतर पुन्हा एकदा जिल्ह्यातून बाळासाहेब थोरात, शंकरराव गडाख व प्राजक्त तनपुरे मंत्री झाले होते. त्यानंतर राज्यात पक्षफुटीमुळे सत्तांतर घडून आले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात युती सरकारमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांना महसूलमंत्री म्हणून महत्त्वाची जबाबदारी मिळाली. आता पुन्हा एकदा जिल्ह्याला मंत्रिमंडळात संधीची प्रतीक्षा आहे. भाजपकडून ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा समावेश निश्चित मानला जातो. मात्र भाजपमधून सलग तिसर्यांदा आमदार झालेल्या मोनिकाताई राजळे, ज्येष्ठ आमदार शिवाजीराव कर्डिले आणि विधान परिषद सदस्य राम शिंदे यांच्यापैकी कोणाला संधी मिळणार, याची भाजप कार्यकर्त्यांना उत्सुकता आहे.
जिल्ह्यातून 4 आमदारांसह अजित पवारांची ताकद वाढविणार्या राष्ट्रवादीतून तरूण चेहरे संधीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यात कोपरगावचे आमदार आशुतोष काळे आणि नगरचे आमदार संग्राम जगताप यांना संधी मिळेल, अशी चर्चा आहे. तर शिवसेनेकडून आ.विठ्ठलराव लंघे यांना संधी मिळावी, अशी मागणी त्यांच्या समर्थकांनी पक्षनेतृत्वाकडे केलेली आहे.