लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी राज्यातील ११ मतदारसंघात आज मतदान होणार आहे. यासाठी प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे. मात्र, मतदानाच्या दिवशीच महाराष्ट्रावर पावसाचे गडद सावट निर्माण झाले आहे. सोमवारी दुपारनंतर अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस कोसळणार, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
यापार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना ऑरेंज तर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुणे, नगर, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सोमवारी अवकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळतील.
याशिवाय नंदुरबार, जळगाव आणि बीड जिल्ह्यातही तुफान पावसाची शक्यता आहे. काही जिल्ह्यात गारपिटीचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याने पुणे, मावळ, शिरूर अहमदनगर, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.तर नंदुरबार, जळगाव, रावेर आणि बीड जिल्ह्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे मतदारांनी सकाळच्या सत्रात मतदान करण्याला प्राधान्य द्यावे. अन्य मतदारांनी दुपारपर्यंत मतदान उरकून घ्यावे, असं आवाहन करण्यात आलं आहे.
सोमवारी दुपारनंतर अलर्ट जारी करण्यात आलेल्या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तर काही भागात गारपीट होण्याचाही अंदाज आहे. दरम्यान, पुढील चार ते पाच दिवस राज्यात पावसाची अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.