शहरात बसस्थानक परिसरातील अंबर प्लाझा या व्यापारी संकुलात सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मोठी आग लागली. यात दोन कार्यालये पूर्णपणे जळून खाक झाली. तर संपूर्ण दुसरा मजला व तिसर्या मजल्यावरील काही भागाला आगीची झळ बसली. महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी सहा नागरिकांना शिडीच्या साहाय्याने बाहेर काढून त्यांचे प्राण वाचवले.
सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास दुसर्या मजल्यावरील एका चार्टर्ड अकाऊंटच्या कार्यालयाला आग लागली. शेजारील एका कार्यालयालाही त्याची झळ बसली. कामकाजाचा वार असल्याने सर्वच कार्यालयात कर्मचारी होते. धूर दिसताच बहुतांश कर्मचार्यांनी इमारतीतून पळ काढला. मात्र, दुसर्या मजल्यावर सहा नागरीक अडकले होते. महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान शिडी घेऊन दुसर्या मजल्यावर चढले व त्यांनी त्यांची सुटका केली. सायंकाळी साडेसात वाजता आग आटोक्यात आल्याचे अग्निशामक दलाचे प्रमुख शंकर मिसाळ यांनी सांगितले.
तोपर्यंत संपुर्ण दुसर्या मजल्यावर धुराचे लोट पसरले होते. घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आत जाण्याचाही प्रयत्न केला. मात्र, आग मोठी असल्याने त्यांना जीन्यातून खाली यावे लागले. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनीही आग विझेपर्यंत तळ ठोकला होता. रात्री उशिरापर्यंत कोतवाली पोलीस ठाण्यात फक्त घटनेची नोंद करण्यात आली होती. आग पूर्ण शांत झाल्यावर पंचनामा होऊन निश्चित नुकसानीचा आकडा सांगता येईल, असे पोलिसांनी सांगितले.
नगरमध्ये आगीत दोन कार्यालये जळून खाक, सहा नागरिकांचे प्राण वाचले….व्हिडिओ
- Advertisement -