महाराष्ट्रात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील अजित पवार गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामागील कारणही अगदी तसंच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने लोकसभेत राज्यभरात 10 जागांवर निवडणूक लढवली होती. यापैकी 8 जागांवर शरद पवार गटाच्या उमेदवारांचा विजय झालाय. तर अजित पवार गटाला केवळ रायगडच्या जागेवर विजय मिळाला आहे. तसेच राज्यात महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं आहे. या निवडणुकीनंतर लगेच सहा महिन्यांनी राज्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. राज्यातील नागरिकांचा सध्याचा मूड हा महाविकास आघाडीच्या दिशेला आहे. त्यामुळे अजित पवार गटात अस्वस्थता असल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवार यांनी आपल्या पक्षाच्या आमदारांची आज बैठक बोलावली होती. या बैठकीला 5 आमदार गैरहजर होते, आमदार नरहरी झिरवळ, सुनील टिंगरे, राजेंद्र शिंगणे, अण्णा बनसोडे, धर्मराव बाबा आत्राम या आमदारांची बैठकीत अनुपस्थिती राहिली.