राज्यात अवकाळी पावसाचा मारा सुरू आहे. पावसामुळे फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे. अवकाळीचं संकट नेमकं कधी दूर होणार? याची वाट बळीराजा पाहत आहेत. अशातच हवामान खात्याने शनिवार आणि रविवारी पुन्हा पावसाचा इशारा दिला आहे.
भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, आज शनिवारी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा आणि विदर्भात सोसाट्याच्या वाऱ्यासह तुफान पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसासोबत काही भागात गारपीट देखील होण्याचा अंदाज आहे.
मराठवाडा आणि विदर्भात ताशी ४० ते ५० च्या वेगाने वारे वाहतील, असा अंदाज वर्तवण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना ऑरेंज, तर काही भागाला यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. शेतकऱ्यांनी पिकांची तसेच फळबागांची काळजी घ्यावी असा सल्लाही देण्यात आलाय.
भारतीय हवामान खात्याने शनिवारी आणि रविवारी पुणे, अहमदनगर, सातारा, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड आणि जळगाव जिल्ह्यांत अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय.
सोलापूर, सांगली, जालना, नांदेड, लातूर, अकोला, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यांमध्ये शनिवार आणि रविवार दोन दिवस तुफान पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. काही जिल्ह्यात गारपीट देखील होऊ शकते. या पार्श्वभूमीवर येलो अलर्ट जारी करण्यात आलाय.