Thursday, May 22, 2025

विहीर घोटाळा : अहमदनगर जिल्ह्यात तीन गटविकास अधिकार्‍यांसह 21 जणांना नोटीस

अहमदनगर – पाथर्डी आणि जामखेड तालुक्यांतील बीडीओंना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. रोहयो योजनेतील सिंचन विहीर मंजूर करताना अनियमितता झाल्याचा अहवाल चौकशी समितीने दिला होता. त्यावरून या नोटिसा काढल्या आहेत. संबंधित बीडीओंना याबाबत दहा दिवसांत अहवाल द्यायचा आहे.
पाथर्डी- जामखेड तालुक्यासह संपूर्ण नगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तसेच विहिरींसह अन्य व्यक्तीगत लाभाच्या योजनांसाठी एजंटगिरी करणार्‍या टोळीमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून पाथर्डी – जामखेड तालुक्यातून पिळवणूक झालेल्या लाभार्थ्यांनी आता न्याय मिळेल म्हणून समाधान व्यक्त केले आहे. गेल्या महिनाभरापूर्वी पाथर्डी आणि जामखेड तालुक्यात ‘रोहयो’ तील विहिरीच्या प्रकरणाची चौकशी जिल्हा परिषद प्रशासनाने सुरू केली होती. या चौकशीत अनेक धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. या योजनेतील एका विहिरीसाठी चार लाखांचे अनुदान असून 700 ते 750 बोगस विहिरींच्या अनुदानाची रक्कम कोटींच्या घरात आहे.

हा प्रकार उघड झाल्याने या योजनेत मलीदा लाटणार्‍यांची नावे चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, प्रशासनाने जामखेडचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, पाथर्डीचे प्रभारी गटविकास अधिकारी जगदीश पालवे, आर. डी. गर्जे यांच्यासह जामखेडचे ‘रोहयो’चे 10 कंत्राटी आणि नियमित कर्मचारी, पाथर्डीचे 8 नियमित व कंत्राटी कर्मचारी अशा 21 जणांना नोटीस बजावत 10 दिवसात खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. ‘रोहयो’तील विहीरी घोटाळ्याचे डफडे वाजताच जामखेड आणि पाथर्डी पंचायत समितीमध्ये अनेकांची बोबडी वळाली असल्याचे पहावयास मिळाले.

जिल्हा परिषदेतून मिळालेल्या माहितीनुसार आता जामखेड आणि पाथर्डी विहीर योजनेत घोटाळा करणार्‍यांची पाळेमुळे खोदण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पीडित शेतकर्‍यांनी तक्रार करण्यास पुढे यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पाथर्डीचे तत्कालीन बीडीओ जगदीश पालवे व गर्जे यांच्यासह जामखेड विद्यमान बीडीओ प्रकाश पोळ यांचा समावेश आहे. विस्तार अधिकारी, तांत्रिक अधिकारी, कार्यक्रम अधिकारी, लिपीक यांच्यासह १३ कर्मचाऱ्यांना या नोटिसा बजावल्या.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles