राज्याच्या राजकारणासाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. कारण, राजधानी दिल्लीमध्ये महाराष्ट्रातल्या राजकारणावर परिणाम करणाऱ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टात आज शिवसेनेच्या दोन मोठ्या सुनावण्या पार पडणार आहेत.
त्यामुळे राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष सुप्रीम कोर्टाकडे लागून आहे. एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे, शिवसेना नेमकी कुणाची? धनुष्यबाण चिन्हावर खरा अधिकार कुणाचा? याबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे. शिवसेना ठाकरे गटाने निवडणूक आयोग आणि १६ आमदार अपात्र प्रकरणात सुप्रीम कोर्टात दोन याचिका दाखल केल्या होत्या. ठाकरे गटाचे प्रतोद सुनिल प्रभू यांनी देखील १६ आमदारांच्या अपात्रतेबद्दल पुनर्विचार याचिका दाखल केली होती.
याशिवाय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध देखील ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. त्यांच्या पुनर्विचार याचिकेवरही आज म्हणजेच सोमवारीच सुनावणी होणार आहे. मागच्या अनेक दिवसांपासून याप्रकरणी सुनावणी झाली नव्हती.आज लागोपाठ या दोन्ही याचिकांवर सुनावणी होणार आहे. दरम्यान, महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टाने ११ मे २०२३ रोजी महत्वपूर्ण निकाल दिला होता. या निकालात सर्वोच्च न्यायालयाने काही महत्त्वाची निरीक्षणं नोंदवली होती.
सुप्रीम कोर्टाने एकनाथ शिंदे यांची गटनेते म्हणून केलेली निवड बेकायदेशीर असल्याचं म्हटलं होतं. तर अजय चौधरी यांची निवड योग्य ठरवली होती. याशिवाय शिंदे गटाने प्रतोदपदी भरत गोगावले यांची केलेली निवडही सर्वोच्च न्यायालयाने बेकायदेशीर असल्याचं म्हटलं होतं.