राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी मंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार अशी चर्चा असतानाच त्यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आले. यामुळे छगन भुजबळ कमालीचे नाराज झाले असून नागपूरचे हिवाळी अधिवेशन सोडून ते नाशिकमध्ये दाखल झाले. यानंतर आज छगन भुजबळ यांनी येवल्यातीलकार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वाह रे, दादाचा वादा, कसला वादा अन् कसला दादा, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.
येवल्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधताना छगन भुजबळ म्हणाले की, तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत येवला-लासलगावचा किल्ला आपण लढवला, तुमचे आभार. भुजबळ साहेब निवडून येणार नाहीत, असे आमच्या राष्ट्रवादीत बोलणे चालले होते. सर्व जाती धर्माचे लोक माझ्यासोबत होते. विशेष करून मराठा समाजाचे आभार. या निवडणुकीत मी मोठ्या संख्येने निवडून आलो. देशात जो प्रयोग झाला नाही तो प्रयोग आपण येवल्यात घडवला. 160 किलोमिटर लांबून पाणी आणलं. मला मते देतील असे वाटत होते. मात्र काही मंडळी चक्करमध्ये पडली. मला कोणाबद्दल अजिबात राग नाही. पाण्याचा प्रकल्प अजून पूर्ण झाला नाही, तो पूर्ण करायचा आहे. ज्यांनी मते दिली नाही त्यांनाही अजून जास्त पाणी द्यायचे आहे, तालुक्याच्या विकासासाठी सगळ्यांना सोबत घ्यायचे आहे. आपल्याला एकत्रित काम करायचे आहे. नगर परिषद, जिल्हा, पंचायत समिती यात आपण आपली ताकद दाखवून देणार आहे, असे त्यांनी म्हटले.
आठ दिवसांपूर्वी समीर भुजबळांना पटेल, तटकरे यांनी बोलवले. नितीन पाटील यांचा राजीनामा घेवून भुजबळ साहेबांना राज्यसभेवर पाठवू, असे सांगितले. मकरंद पाटील यास मंत्रिपद द्यायचे अन् त्याच्या भावाला खाली बोलवायचे. हा काय पोरखेळ आहे का? लोकांनी मला निवडून दिले, त्यांना मी काय तोंड काय देवू. त्यांना भुजबळांचा बळी घ्यायचा होता का? छगन भुजबळ काय लल्लू पाटील आहे का? हा काही पोरखेळ आहे का? माझ्या मनात मंत्री पदाची शंका होती, अन् त्याप्रमाणे झाले. माझी जर किंमत होत नसेल तर काय उपयोग? दादाचा वादा. वाह रे दादाचा वादा, कसला वादा, अन् कसला दादा, असे म्हणत छगन भुजबळ यांनी संताप व्यक्त केलाय.
ते पुढे म्हणाले की, हा लढा मंत्रीपदाचा नाही, तर अस्मितेचा आहे, लढा अपमानाचा आहे. मी पुन्हा उभा राहील, लोकशाही आहे. पटेल, तटकरे यांचे कॉल पण ते ऐकत नसल्याचे सांगितले. फडणवीस देखील अजित पवारांना बोलले, भुजबळांना मंत्री करा. पण त्यांनी ऐकले नाही. सरकारी पक्षात असल्याने बोलता येत नाही. जे झाले ते लोकांच्या कानावर टाकणे गरजेचे आहे. विविध पक्षातील लोक नाराज झाले, पण दादांचा वादा महत्त्वाचा आहे. मी कुठेच जाणार नाही, इथेच राहणार आहे. उद्या समता परिषद मेळावा आहे. मला त्यांच्याशी चर्चा करायची आहे. कोणीही खचून जावू नका, निराश होवू नका, असे आवाहन त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले.