उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संघर्ष यात्रेवरून रोहित पवार यांना लक्ष्य केलं होतं. कर्जतमधील वैचारिक मंथन शिबिरात बोलताना अजित पवारांनी म्हटलं, “काहीजण गुडघ्याला बाशिंग बांधून फिरत आहेत. संघर्ष म्हणे… अरे कशाचा संघर्ष… कधी आयुष्यात संघर्ष केला नाही, आता कशाचा संघर्ष करत आहात.” याला प्रत्युत्तर देताना रोहित पवार ‘एक्स’ अकाउंटवर म्हणाले, “आदरणीय अजित दादा, युवांच्या मागण्यांसाठी आम्ही सर्व युवा पुणे ते नागपूर असा ८०० किमीचा पायी प्रवास करत असून नागरिकांशी संवाद साधत आम्ही आतापर्यंत ५०० किमीचा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे. आपल्या नजरेत आमचा हा संघर्ष लहान असला तरी ज्या मागण्यांसाठी आम्ही संघर्ष करत आहोत. त्या मागण्या अत्यंत महत्वाच्या असून लाखो युवांच्या भविष्याशी निगडित आहेत आणि याच मागण्यांसाठी भविष्यात मोठ्या संघर्षाची देखील आमची तयारी आहे.”
“युवांच्या, सर्वसामान्यांच्या प्रश्नांना घेऊन चाललेल्या युवा संघर्ष यात्रेकडे राजकीय टीकेसाठी का होईना आपले लक्ष गेलेच आहे. तर, युवकांचे जे मुद्दे आम्ही घेऊन चाललो आहोत त्यांच्याकडेही थोडे लक्ष द्या. आपण माझ्यावर काहीही टीका करा, टीका मी पचवून घेईल. परंतु, युवांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर अजिबात खपवून घेणार नाही,” असा इशारा रोहित पवारांनी अजित पवारांना दिला आहे. तुमची कार्यक्षमता आणि तळमळ महाराष्ट्राने याआधीही पाहिली आहे,भाजपसोबत गेलात म्हणून ती कार्यक्षमता आणि तळमळ कमी झाली असल्याच्या चर्चा असल्या तरी युवांचे प्रश्न मार्गी लावून आपली खरी ताकद पुन्हा एकदा दाखवून द्या.