कल्याण – विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गाचा आज ज्यांना पुळका आला त्यांनी महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना हे काम का पूर्ण केले नाही ? त्यावेळी हे झोपा काढत होते का? अशी खरमरीत टीका खा.डॉ.सुजय विखे यांनी विरोधकाचे नाव न घेता केली.
जिल्हा परिषदेचे माजी सभापती अर्जुन शिरसाठ यांच्या एकसष्टीनिमित्त बाबूजी आव्हाड महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी जि.प.सदस्या ललिता शिरसाठ, अभय आव्हाड, गोकुळ दौंड, डॉ. मृत्युंजय गर्जे, देविदास खेडकर, अजय रक्ताटे, भगवान दराडे, अॅड.प्रतीक खेडकर, बंडू बोरुडे, मंगल कोकाटे, संजय फुंदे, शुभम गाडे, राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. तत्पुर्वी आमदार मोनिका राजळे यांनी अर्जुनराव शिरसाट यांचा वसंतराव नाईक चौकात सत्कार केला.
यावेळी बोलताना खा.विखे म्हणाले, तिसगाव, मिरी, शेवगाव रोड अशा अनेक रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्यावर ते कधी बोलले नाही. चार दिवस उपोषण करूनही वजन घटत नाही हे पूर्ण जिल्ह्याने पाहिले आहे.कोण कधी जेवले याचे व्हिडीओ आपल्याकडे आहेत.यांचे खरे चेहरे योग्यवेळी बाहेर काढले जातील.दिल्लीत आम्हाला कोणी विचारत नाही, असे म्हणणार्यांनी काल परवा पेपरमध्ये आलेले फोटो पाहावेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्धा तास स्व. विखे यांच्या आठवणींना उजाळा दिला.