राज्यातील महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते व राज्यसभा खासदार प्रफुल पटेल यांच्याविरोधात २०१७ मध्ये नोंदविण्यात आलेला भ्रष्टाचाराचा खटला केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) बंद केल्याची माहिती आहे. ‘वायर’ या वृत्तसंकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार पटेल यांना निर्दोषत्व बहाल केल्यानंतर काँग्रेसने केंद्र सरकारवर टीकेची झोड उठविली आहे.
काँग्रेसप्रणित ‘यूपीए-२’च्या मनमोहन सिंग सरकारमध्ये पटेल केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री होते. त्यावेळी एअर इंडियाची विमाने भाडेतत्त्वावर घेण्याच्या निर्णयामध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. २०१७ मध्ये ‘सीबीआय’ने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, या प्रकरणी आर्थिक अनियमिततेच्या आरोपांची चौकशी सुरू केली. नागरी वाहतूक मंत्रालय व एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, सुमारे सात वर्षांनतर सीबीआयने तत्कालीन मंत्री प्रफुल्ल पटेल आणि मंत्रालयातील तसेच, एअर इंडियाच्या तत्कालीन अधिकाऱ्यांना क्लीनचिट दिली असून या प्रकरणाचा तपास बंद केला आहे. मार्च २०२४मध्ये न्यायालयासमोर तपास बंद केला जात असल्याचा अहवाल सादर करण्यात आल्याचे ‘वायर’च्या वृत्तामध्ये नमूद केले आहे. या वृत्तानुसार, तत्कालीन नागरी विमान वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला व मंत्रालय व एअर इंडियातील काही अधिकार तसेच खासगी क्षेत्रातील व्यक्तींच्या मदतीने एअर इंडियासाठी भाडेतत्त्वावर घेतलेल्या विमानांच्या व्यवहारांमध्ये आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप सीबीआयने ठेवला होता.