नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची जागा आम्हीच जिंकणार… मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा विश्वास..

0
19

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लोकसभा निवडणुक निकालाआधी आलेल्या exit poll वर प्रतिक्रिया देत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाबाबत भाष्य केलं. तसंच काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका करत दुसऱ्याची तळी उचलण्यामध्ये ते धन्यता मानतात, असा खोचक टोला लगावला.
“बाळासाहेब थोरात यांनी थोडी तरी लाज बाळगली पाहिजे. ते स्वतःला काँग्रेसचे नेते समजतात. मात्र आपल्या जिल्ह्यामध्ये ते काँग्रेससाठी एकही जागा घेऊ शकले नाहीत. दुसऱ्यांची तळी उचलण्यामध्ये ते धन्यता मानतात. त्यामुळे त्यांची वैचारिक दिवाळखोरी यामधून सिद्ध होते. त्यांनी मदत केल्यामुळे नगर दक्षिणची जागा येईल, अशा या भ्रामक कल्पना आहेत.त्यांनी भविष्यात स्वत:च्या अस्तित्वाची काळजी करायला सुरूवात केली पाहिजे”, अशा खोचक शब्दांत राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका केली.

एक्झिट पोलसंदर्भात बोलताना राधाकृष्ण विखे म्हणाले, महाराष्ट्रामध्ये महायुतीला यश मिळेल. एक्झिट पोल आल्यानंतर राजकीय विश्लेषक विश्लेषण करत असतात. या सर्वांना ४ जूनला उत्तर मिळेल. आता नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची जागा आम्ही जिंकणार हा विश्वास आम्हाला पहिल्यापासून होता. थोडा सोशल मीडियाचा परिणाम होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून विष पेरण्याचा प्रयत्न झाला. पण जनतेचा कामावर विश्वास आहे. आमचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विश्वनेते आहेत. त्यांचा आशीर्वाद डॉ.सुजय विखे यांना होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचंही मार्गदर्शन आहे”, असं राधाकृष्ण विखे पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले.