अहमदनगर जिल्ह्यात ‘या’ परिसरात रविवारी प्रतिबंधात्मक आदेश

0
59

४ जून रोजी २९ उपकेंद्रावर महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा

१०३६८ परीक्षार्थी, ९५४ अधिकारी- कर्मचाऱ्यांची नियुक्ती

परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

अहमदनगर, दि. 1 जुन :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणारी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ रविवार, ०४ जून २०२३ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील २९ उपकेंद्रावर सकाळी १० ते दुपारी १२ व दुपारी ३ ते ५ वाजता यावेळेत घेण्यात येणार आहे. या परीक्षेस जिल्ह्यातून १०३६८ परीक्षार्थीं बसलेले आहेत. अशी माहिती परीक्षेचे केंद्रप्रमुख तथा निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

या परीक्षेकामी उपजिल्हाधिकारी संवर्गातील समन्वय अधिकारी-८ , भरारी पथक प्रमुख-१, वर्ग १ संवर्गातील उपकेंद्र प्रमुख – २९ अधिकारी तसेच पर्यवेक्षक, सहायक, समवेक्षक, मदतनीस असे विविध वर्ग ३ संवर्गातील एकूण ९५४ अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

परीक्षेस बसलेल्या उमेदवारांना परीक्षा केंद्रावर सकाळी ८.३० वाजता प्रवेश देण्यात येणार आहे. उमेदवारांनी काळया शाईचे बॉलपॉइंट पेन वापरणे आवश्यक असून उमेदवारांना एकमेकांचे पेन लिखान साहित्य इ. वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. मोबाईल पेजर डिजीटल डायरी, मायक्रोफोन, स्मार्टवॉच यांसारखी दूरसंचार साधने व कॅल्क्युलेटर इ. परीक्षा केंद्राच्या परीसरामध्ये आणि परीक्षा दालनात आणण्यास व स्वतःजवळ बाळगण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे. या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या उमेदवारास सदर परिक्षेसाठी व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पुढील सर्व परीक्षांसाठी कायमस्वरूपी प्रतिरोधीत करण्यात येणार आहे.

कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रत्येक उपकेंद्रावर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच परीक्षा उपकेंद्राच्या १०० मीटर परिसरातील एसटीडी बुथ, फॅक्स मीटर, झेरॉक्स दुकाने बंद ठेवणेकामी परिक्षेच्या दिवशी परिक्षाक्षेत्रामध्ये सकाळी ७ वाजेपासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत फौजदारी प्रक्रीया संहिता कलम १९७३ चे कलम १४४ (३) लागू करण्यात आलेले आहे. परीक्षेची प्रवेश प्रमाणपत्रे उमेदवारांनी स्वतः आयोगाच्या वेबसाईटवरुन डाऊनलोड करुन घ्यावयाची आहेत. दुय्यम प्रवेश प्रमाणपत्रे जिल्हाधिकारी कार्यालयामधून देण्यात येणार नाहीत याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. असेही श्री.राजेंद्रकुमार पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.