अहमदनगर शहरातील कायनेटिक चौकात बारामती येथे जाण्यासाठी वाहनाची वाट पाहत थांबलेल्या चार कामगारांना जबर मारहाण करीत लुटणाऱ्या दरोड्यातील टोळीला कोतवाली पोलिसांनी अवघ्या दोन तासात जेरबंद केले आहे. तीन आरोपींना अटक केली असून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. गुन्हा करून रिक्षाने पळून जात असताना पाठलाग करून या टोळीच्या मुसक्या कोतवाली पोलिसांनी आवळल्या आहेत.
स्वप्नील बाबुराव साळवे (वय २९ वर्ष), निरज रवी पटारे (वय १९ वर्ष), रितेश सुरेश शेंडगे (सर्व रा. शाहुनगर केडगाव अहमदनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. प्रीतम उर्फ पेप्या सावंत (रा.मोहिनी नगर केडगाव, अहमदनगर) हा आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला आहे. मंगळवारी (दि.२९) रात्री १.३० वाजताच्या सुमारास पवन सुरेश पैठणे, किरण रामेश्वर गोफणे, अजय लक्ष्मण गोफणे, गोविंद दादाराव गोफणे असे चौघे बारामती येथे जाण्यासाठी कायनेटिक चौकात वाहनाची वाट पाहत थांबलेले होते. दरम्यान पहाटे २.३० वाजता सहाजण तिथे रिक्षामधून (एम.एच १२बीडी ४६१३) आले व आरोपी राहुल डावरे याने पवन सुरेश पैठणे यांच्या तोंडावर फाईट मारुन गळयातील चैन, खिशातील मोबाईल, व दोन हजार रुपये रोख काढून घेतले. आरोपी रितेश सुरेश शेंडगे, निरज रवी पटारे या दोघांनी गोविंद दादाराव गोफणे याला मारहाण करुन त्यांचा मोबाईल फोन खिशातून काढून घेतला. आरोपींनी चौघांना मारहाण केली व प्रीतम उर्फ पेप्या सावंत (रा.मोहिनीनगर, केडगाव) याने कोयत्याने तुमचे हातपाय तोडून टाकील, अशी धमकी देत आरोपी रिक्षामधून पळून गेले होते. पवन सुरेश पैठणे (रा. तपोवन गोंधन, ता.जाफराबाद जि. जालना) यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात भादवि कलम ३९५ प्रमाणे दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
कोतवाली पोलिसांना आरोपी केडगाव परिसरात असल्याची माहिती मिळताच कोतवाली पोलीस आरोपींच्या शोधासाठी रवाना झाले. कोतवाली पोलिसांनी आरोपींचा पाठलाग करून जेरबंद केले. चोरीला गेलेल्या ऐवजासह गुन्ह्यात वापरलेली रिक्षा व इतर असा ९३ हजार ३०० रुपयांच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.
पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे, उपनिरीक्षक प्रवीण पाटील,
स.फौ. अशोक सरोदे, पोकॉ याकुब सय्यद, तानाजी पवार, सोमनाथ मुरकुटे, प्रशांत बोरुडे, मधुकर चव्हाण, सत्यम शिंदे, योगेश ठोंबे, होमगार्ड पाटसकर, होमगार्ड मुर्तुजा सव्यद, होमगार्ड शिंदे यांनी ही कारवाई केली आहे. सपोनी रवींद्र पिंगळे यांनी विशेष योगदान दिले.