ढाकणे पॉलिटेक्निक कॉलेज ‘ प्राईड ऑफ नेशन पुरस्काराने सन्मानित

0
176

शेवगाव: मौजे राक्षी ता. शेवगाव येथील कै.सौ.सुनिताताई एकनाथराव ढाकणे पॉलिटेक्निक कॉलेज, शेवगाव या तंत्रनिकेतन महाविद्यालयास एशियन टूडे रिसर्च अॅण्ड मिडीया, नवी दिल्ली या जागतिक दर्जाच्या संस्थेमार्फत ग्रामीण भागात सामाजिक आर्थिक विकासकामी प्रयत्नशील असलेल्या राष्ट्रीय स्तरावर पहिल्या ५० संस्थांसाठी दिले जाणारे ‘बेस्ट पॉलिटेक्निक कॉलेज इन महाराष्ट्र’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याचे विद्यमान राज्यपाल आणि कुलपती मा. भगतसिंह कोश्यारी यांच्या शुभहस्ते तसेच केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा. रामदासजी आठवले, विधानसभा अध्यक्ष मा. राहुलजी नार्वेकर राज्यसभा सदस्या आणि सिने अभिनेत्या मा. जया प्रदा, सिनेअभिनेते कबीर बेदी यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक ०७ ऑक्टोबर २०२२ रोजी सायंकाळी ०४ वाजता हॉटेल ट्रायडेन्ट, मुंबई येथे “एज्युकेशन प्राईड समिट अॅण्ड अवार्ड २०२२ अंतर्गत ह्या राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराचे वितरण करण्यात आला. सदरील पुरस्कार संस्थेचेवतीने संस्थेचे अध्यक्ष मा. एकनाथरावजी ढाकणे व सचिव श्रीमती जयवंता रहाणे यांनी स्विकारला असल्याची माहिती संस्थेचे प्राचार्य डॉ. आर.एच अत्तार यांनी दिली. संस्थेस यापूर्वीही २०१२ साली नवी दिल्ली येथे शिक्षा भारती पुरस्काराने तसेच २०१५ साली नॅशनल एक्सलन्स अवार्ड या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले होते. संस्थेच्या कार्याची दखल राष्ट्रीयस्तरातून घेतले जात असल्याने परिसरात आनंदाचे वातावरण आहे. आपल्या सत्कारास उत्तर देताना अध्यक्ष मा. एकनाथरावजी ढाकणे यांनी सांगितले की, हा सन्मान माझा किंवा माझ्या संस्थेचा नसून परिसरातील कष्टकरी, उसतोड कामगार, शेतकरी समाज, सूज्ञ पालक, विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेत्तरवृंद यांचा आहे. परिसराच्या व संस्थेच्या प्रगतीसाठी अहोरात्र झटणाऱ्या प्रत्येक घटकाचा आहे.

सन २०१० पासून मौजे राक्षी ता. शेवगाव याठिकाणी कार्यरत असलेल्या या तंत्रनिकेतन महाविद्यालयातून आतापर्यंत १८६९ विद्यार्थ्यांनी शिक्षण पूर्ण करून जवळपास ५७ टक्के म्हणजेच १०६९ विद्यार्थी विविध शासकीय तसेच खाजगी कंपन्यांमध्ये काम करीत आहेत तर उर्वरित विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेत आहेत. ग्रामीण भागातील गरजू च होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कामध्ये विशेष सवलत दिली जाते. एकूणच ग्रामीण भागात रोजगारक्षम शिक्षण देणारी एकमेव संस्था म्हणून या संस्थेकडे पाहिले जाते. संस्थेचा निकाल सलग परीक्षांमध्ये ९५ टक्केपेक्षा जास्त लागला आहे. याचीच दखल घेत संस्थेस तब्बल तीन राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे. संस्थेने अल्पावधीतच राष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवल्याबाबत अनेक शैक्षणिक, सामाजिक, राजकिय स्तरातून संस्थेचे अभिनंदन होत आहे.