केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेस नेते आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं कौतुक केलं आहे. आर्थिक सुधारणांसाठी आपण मनमोहन सिंग यांचे ऋणी असल्याचं नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे. TIOL पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी नितीन गडकरी यांनी भारताला गरिबांना फायदा देणाऱ्या उदारमतवादी आर्थिक धोरणाची गरज आहे असल्याचं मत मांडलं.
“उदारमतवादी आर्थिक धोरणामुळे देशाला नवी दिशा मिळाली. यासाठी देश मनमोहन सिंग यांचा ऋणी आहे,” असं सांगत नितीन गडकरी यांनी कौतुक केलं. मनमोहन सिंग यांच्या आर्थिक धोरणांमुळेच आपण १९९० दरम्यान महाराष्ट्रात रस्ते निर्माण करताना निधी उभारु शकलो असं यावेळी त्यांनी सांगितलं.
नितीन गडकरी यांनी यावेळी चीनचाही उल्लेख केला. उदारमतवादी आर्थिक धोरण देशाच्या विकासात कशाप्रकारे मदत करतं याचं चीन हे उत्तम उदाहरण असल्याचं नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे. आर्थिक विकासाला गती देण्यासाठी अधिक कॅपेक्स गुंतवणुकीची गरज असल्याचं मत गडकरींनी यावेळी मांडलं