संगमनेरमध्ये येताच काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले आमदार सत्यजीत तांबे यांना मोलाचा सल्ला दिला आहे. मधल्या काळात टीका करणारे त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचाही थोरात यांनी समाचार घेतला. ‘
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी थोरात यांच्यावर टीका केली होती. थोरात म्हणाले, आपल्या शेजारच्या मंत्र्यांना माझी आठवण काढल्याशिवाय करमत नाही. एकही दिवस खाडा न करता ते टीका करतात. मुळात ते राज्याचे मंत्री असले तरी फारसे कोठे जात नाहीत. याच भागात फिरतात. कोठे गेलेच तर तेथे गेल्यावरही किमान अर्धातास माझ्यावरच बोलतात. संगमनेर तालुक्यात त्यांचे काय काय उद्योग सुरू आहेत, तेही आम्हाला माहिती आहे. त्यांचा हा त्रास आता फारकाळ चालणार नाही. दहशतीने मतदारसंघावर वर्चस्व मिळविले असेल तर ते इतर तालुक्यांत मिळविता येणार नाही. हे त्यांनी लक्षात घ्यावे. त्यांच्यासोबतच त्यांचे चिरंजीवही बोलत असतात. सतत गौण खनिज आणि वाळूचा विषय काढतात. मात्र, वाळूवर बंदी घातली तर विकास काम ठप्प होतात. त्यांच्या या धोरणामुळे निळवंडे धरणाचे काम रखडले आहे. वाळू संबंधी ते इतरांवर टीका करीत असले तरी हनुमंत गावात त्यांचे काय चालले आहे, हे आम्हाला माहिती आहे. त्यांचीही ही दहशत आम्ही लवकरच मोडून काढू, असेही थोरात म्हणाले.