बीडचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणावरून परभणी येथील मोर्चा वेळी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा खणखणीत इशारा दिल्यानंतर आता महायुतीच्या नेत्यांकडूनही प्रत्युत्तर देण्यात येत आहे. दरम्यान, यावर बोलताना राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनीही मनोज जरांगेंवर जहरी टीका केली असून मनोज जरांगेच्या डोक्यात फरक पडला असल्याचे म्हटले आहे. तो वैफल्यग्रस्त झाला आहे. त्याच्या बोलण्याकडे कोणी लक्ष देऊ नका, अशा शब्दात त्यांनी जहरी टीका केली आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणांमध्ये महायुतीचे नेते धनंजय मुंडे यांच्या राजीनामाची मागणी विरोधकांकडून करण्यात आली होती. यावरून बोलताना शिवसेना शिंदे गटाचे नेते आशिष जयस्वाल यांनी विरोधकांना टोला लगावला असून प्रत्येक गोष्टीचा राजकीय भांडवल करायचं नसतं, बीड प्रकरणांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः गृहमंत्री असून ते जो कुणी आरोपी असेल त्याच्यावर कठोर कारवाई करतील, अशी प्रतिक्रिया मंत्री आशिष जयस्वाल यांनी दिली आहे.






