सोलापूर: येत्या 2024 च्या निवडणुकीसाठी आपण सज्ज रहायला हवे, त्यासाठी आपले सैन्य तयार पाहिजे. म्हणूनच प्रत्येक बुथवर आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. प्रत्येक बुथवर राष्ट्रवादी प्लसमध्ये पाहिजे, जर आपण मायनसमध्ये जात असाल तर का मायनसमध्ये जातोय याचा अभ्यास करण्याची गरज आहे, असं सांगत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या कामाला लागण्याचं आवाहन केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद यात्रेच्या पाचव्या पर्वाला आज सांगोला येथून सुरुवात झाली. सांगोला विधानसभा मतदारसंघाचा आढावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतला. माजी आमदार दिपकआबा साळुंखे यांनी विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामे व जलसंपदा विभागाच्या कामाची निवेदन सादर केली. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे आदींनी आपले विचार मांडले.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रत्येक निर्णयाला आपण पाठिंबा दिला आहे. यापुढेही द्याल याची मला खात्री आहे. दिपकआबा यांनी राष्ट्रवादीची ताकद कायम ठेवली आहे. या मतदारसंघात बदल घडवण्याचे काम आपल्याला करायचे आहे. आपण पक्ष संघटना किती गांभीर्याने घेता याचा आढावा या संवाद यात्रेत घेत असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. सांगोला तालुक्यातील जास्त गावे पाण्याखाली आली पाहिजे यासाठी दिपकआबा साळुंखे यांनी सांगितल्यावर प्रयत्न करतोय. नादुरुस्त बंधारे दुरुस्तीलाही मान्यता दिली आहे, असेही त्यांनी सांगितलं.