राज्यात पावसाचा जोर वाढत चालला आहे. गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने आता राज्यातील अनेक ठिकाणी जोर धरण्यास सुरूवात केली आहे. अशामध्ये हवामान खात्याने पावसाबाबत महत्वाची अपडेट दिली आहे. पुढचे चार दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये जोरदार पाऊस पडणार असून या ठिकाणी हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. पावसाचा वाढता जोर लक्षात घेता नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन हवामान खाते आणि प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात येत्या ३० जून ते ३ जुलैपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भामध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रात आजपासून ते १ जुलैपर्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात देखील पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
राज्यात पुढचे चार दिवस मघेगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढचे चार दिवस ठाणे, सिंधुदुर्ग, सातारा आणि नाशिकमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या ठिकाणी हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे.