राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या स्पष्ट बोलण्यामुळे अनेकदा ते वादात देखील सापडले आहेत. काही दिवसांपूर्वीच बुलढाण्यातील ऐतिहासिक वास्तूचं जतन आणि संवर्धन करण्यावरून त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली असताना नुकतंच साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहाच्या बांधकामावरून त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावलं आहे. शिवाय, नंतर थेट स्टेजवरूनच या अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली आहे.
“शासकीय विश्रामगृहाचं उद्घाटन झालं. पण मला काही ते आवडलेलं नाही. मी आता त्या बांधकामाची चौकशी लावणार आहे. मला अधिकाऱ्यांना सांगायचंय की बाबांनो, तुम्हाला आम्ही दीड लाख कोटी रुपये पगार आणि निवृत्ती वेतन देतो. आमच्या सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या टॅक्सचा तो पैसा असतो. ते करताना कामं तरी चांगली करत चला”, असं अजित पवार म्हणाले.
“कुठं फेडाल ही पापं? वर गेल्यानंतर तुम्हाला तर नरकातच जावं लागेल. लोकांनी पण म्हटलं पाहिजे की खरंच त्या सरकारच्या काळात हे काम एक नंबर झालं. नाहीतर आम्ही मुंबईला आमच्या घरी पोहोचेपर्यंत इथे काहीतरी तुटलेलं असायचं. काय त्याला करायचंय? मग त्याबद्दल कारवाई नको का करायला?






